मुंबई : भारतीय संघाला इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पहिला टी-२० सामना खेळविण्यात आला होता. पराभवानंतर संघाचे अपयश कर्णधार विराट कोहलीने स्वीकारले आहे. विराट कोहली म्हणाला की, या खेळपट्टीवर फलंदाजी कशी करावी हे आमच्या फलंदाजांना समजले नाही.
विराट म्हणला की, अहमदाबादच्या खेळपट्टीवर त्यांचा चांगला दिवस नव्हता. आम्हाला त्या खेळपट्टीवर काय करायचे हे माहित नव्हते. आमच्या शॉट्समध्ये प्लेसमेंटचा अभाव होता आणि आम्ही त्यावर मात केली पाहिजे. आम्ही आमच्या चुका स्वीकारल्या आहेत. फलंदाज म्हणून आम्हाला सुधारणा करणे आवश्यक आहे. खेळपट्टीवर आमचा दिवस चांगला नव्हता.
यावेळी विराट कोहलीने श्रेयश अय्यरचे कौतुक देखील केले. विराट म्हणाला, आमच्यासाठी ही एक वाईट सुरुवात होती. मात्र, श्रेयसची खेळी आमच्यासाठी उत्तम उदाहरण आहे, की खेळपट्टीची खोली आणि बाऊन्सचा वापर करायचा आहे. त्याने उत्तम खेळी खेळली. पण, बाकीच्या फलंदाज तसे करण्यास अपयशी ठरले. आम्ही आमची चूक मान्य करतो. संघातील प्रत्येकाला त्याची चूक कळाली आहे आणि पुढच्या सामन्यात आम्ही याची नक्की काळजी घेऊ, असेही विराट म्हणाला.